केंद्र सरकारने अमेरिकेसोबत व्यवहार करून ‘भारतमाते’चा सौदा केला; राहुल गांधींचा लोकसभेत सरकारवर घणाघाती हल्ला
नवी दिल्ली:
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर अत्यंत आक्रमक आणि कठोर शब्दांत टीकास्त्र सोडले. अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होताना राहुल गांधी यांनी अमेरिकेसोबतच्या व्यापारी करारावरून सरकारला धारेवर धरले. केंद्र सरकारने अमेरिकेसोबत केलेल्या करारांमुळे केवळ तडजोड झाली नसून, हा प्रकार म्हणजे थेट ‘भारतमाते’ची विक्री करण्यासारखाच आहे, असा अत्यंत गंभीर आरोप त्यांनी सभागृहात केला.
राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात दावा केला की, मोदी सरकारने देशाची ऊर्जा सुरक्षा आणि अन्नदात्या शेतकऱ्यांच्या हिताकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. अमेरिकेसमोर सरकारने पूर्ण शरणागती पत्करली असून, या करारांमुळे भारताचे मोठे नुकसान होणार आहे. देशातील कोट्यवधी नागरिकांचा महत्त्वाचा डेटा आता परकीय देशांच्या हाती गेल्याची भीतीही त्यांनी या वेळी व्यक्त केली. देशाच्या सुरक्षेच्या आणि सार्वभौमत्वाच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत घातक असल्याचे मत त्यांनी मांडले.
यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी ‘एपस्टीन फाइल्स’चा (Epstein Files) उल्लेख करत सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली. त्यांच्या या विधानांमुळे सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. विरोधी पक्षनेत्यांनी केलेल्या या आरोपांना उत्तर देताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राहुल गांधींचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. सरकारने देशहिताशी कोणतीही तडजोड केली नसून हे आरोप बिनबुडाचे असल्याचे सरकारी पक्षाकडून सांगण्यात आले आहे.ह
✍🏻मुख्य संपादक – VINOD MORE






















